केजीएफ चित्रपटाच्या माध्यमातून देशभरातील चित्रपट रसिकांच्या मनात स्थान निर्माण करणारा अभिनेता यश याचा ३४ वा वाढदिवस आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील यशचे वडील बस ड्रायव्हर आहेत. यश मूळचा कर्नाटकातल्या हसन जिल्ह्यातील एका छोट्या गावातला. म्हैसूरमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर यश बेंगळुरूला गेला आणि तिथं बी.व्ही.कारंथांनी स्थापन केलेल्या बेनाका या नाटक करणाऱ्या ग्रुपमध्ये काम करायला सुरुवात केली. केजीएफ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात दिग्दर्शक एस.एस.राजमौली म्हणाले, ‘यश हा एका बस ड्रायव्हरचा मुलगा आहे हे ऐकल्यावर मी चकितच झालो आणि त्याचे वडिल अजूनही नोकरी करतात हे कळल्यावर तर मी थक्कच झालो माझ्या दृष्टिने यशपेक्षा त्याचे वडिलच खरे हिरो आहेत.’
एका दशकाच्या काळात यशने जोरदार प्रगती केली असून तो सध्या कन्नड भाषेतला सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार आहे. कन्नड चित्रसृष्टीतला सर्वांत महागडा चित्रपट केजीएफच्या अद्वितीय यशानंतर सध्या तो एका प्रोजेक्टसाठी १५ कोटी रुपये घेतो. देशभर यश मिळवणारा केजीएफ हा चित्रपट कन्नड भाषेतील २०० कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला असून या वर्षी प्रदर्शित होणारा केजीएफ २ त्याहून यशस्वी ठरेल आणि कन्नडमधील ५०० कोटींचा व्यवसाय करणारा पहिला चित्रपट ठरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी नंद गोकुळ नावाच्या टीव्ही मालिकेत यशने काम केलं आहे. सुरुवातील यशने टीव्ही मालिकांत सहायक कलाकार म्हणून काम केलं. २००७ मध्ये जांबाडा हुडुगी या कन्नड चित्रपटात यशने केलेल्या छोट्याशा भूमिकेमुळे त्याला चित्रपटांत ब्रेक मिळाला. तिथेच त्याला त्यांची भावी पत्नी राधिका पंडित भेटली आणि त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण होऊन त्यांनी नंतर लग्न केलं. त्यांना दोन मुलही आहेत. यश आणि राधिकाने स्थापन केलेल्या यशोमार्ग फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेमार्फत ४ कोटी रुपयांची गुंतवणूक करून कर्नाटकातील कोप्पळ जिल्ह्यातील तलावांची पुनर्बांधणी केली आहे.
२०१८ ला जबरदस्त हिट झालेला चित्रपट केजीएफच्या दुसऱ्या पार्टची लोकांमध्ये जरबदस्त उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा टीझर आज लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटातील मुख्य अभिनेता यशच्या वाढदिवसाच्या मुहुर्तावर हा टीझर रिलीज करण्यात आला आहे. दुसऱ्या पार्टमध्ये अभिनेता संजय दत्त व अभिनेत्री रविना टंडन यांची एन्ट्री झाली आहे. केजीएफच्या दुसऱ्या भागातून अभिनेता संजय दत्त दिर्घकाळाने व जीवघेण्या आजाराशी लढा देऊन आल्यानंतर चित्रपटसृष्टीत कमबॅक करत आहे. त्यामुळे त्याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.