कर्नाटकातील बेळगाव, कारवार निपाणीसह शेकडो गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी संघर्ष करत असलेली महाराष्ट्र एकीकरण समिती दरवर्षी १७ जानेवारीला ‘हुतात्मा दिन’ पाळत असते. सीमा प्रश्नातील हुतात्म्यांना अभिवादन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ‘मुख्यमंत्र्यांनी अभिवादन संदेशात म्हटलं होतं की, “सीमा प्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग, समर्पणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबियांना मानाचा मुजरा. कर्नाटक व्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत.”
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांनी रिप्लाय केला आहे. कर्नाटकची इंचभरही जमीन देणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. येदियुरप्पा म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य सौहार्दपूर्ण वातावरण बिघडवू शकते. सच्चे भारतीय म्हणून उद्धव ठाकरे देशाच्या संघराज्यीय तत्त्वांचा आदर करतील, अशी मला आशा वाटते. दरम्यान, कर्नाटकात काँग्रेससह सर्वपक्षीय नेत्यांनी उद्धव यांच्या वक्तव्याचा निषेध केला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे मला दु:ख झालं. यामुळे सध्याचं सौहार्दाचं वातावरण बिघडू शकतं. मला आशा आहे की, एका खऱ्या भारतीयाप्रमाणे उद्धव ठाकरे संघराज्याच्या सिद्धांतांच्या प्रति कटिबद्धता आणि सन्मान दाखवतील. कर्नाटकात मराठी भाषिक सौहार्दाने कन्नडिगांसह राहत आहेत.
दुसरीकडे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या म्हणाले की, बेळगाव कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे. जो मुद्दा अनेक वर्षांपूर्वीच सुटला आहे, तो पुन्हा चर्चेत आणून भडकवण्याचा प्रयत्न करु नये. उद्धव ठाकरे केवळ शिवसैनिक, पक्षप्रमुखच नाही तर एक जबाबदार मुख्यमंत्री देखील आहेत.
जेडीएसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “उद्धव ठाकरे अतिरेक्यासारखी भाषा बोलत आहेत. कर्नाटकचा भाग महाराष्ट्रात सामील करणारं त्यांचं वक्तव्य हे चीनच्या विस्तारवादा सारखंच आहे,” असं ते म्हणाले.
त्या राज्याचे गृहमंत्री बसवराज बोंमई महाराष्ट्राला पोकळ धमक्या देत आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादात बोंमई यांनी सोलापूर, सांगली कर्नाटकात घेऊ असं विधान करून नव्या वादाला तोंड फोडलं आहे.
दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावादाचा प्रश्न पुन्हा उफाळून वर येण्याची शक्यता दिसत आहे. संवेदनशील महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर बेळगावसह अनेक ठिकाणी सोमवारी निषेध व्यक्त करण्यात आला होता.