दहावी, बारावीपासून स्पर्धा परीक्षेची नेमकी तयारी कशी करावी असा प्रश्न शालेय विद्यार्थी व त्यांच्या पालकांना नेहमीच पडत असतो. जे विद्यार्थी दहावी, बारावीला आहेत. त्यांनी उन्हाळ्याच्या सुटीत जर एम.पी.एस.सी. किंवा यु.पी.एस.सी.साठी घेण्यात येणाऱ्या फाऊंडेशन कोर्सला प्रवेश घेतला तर त्यांना योग्य दिशा मिळू शकते. यानंतर विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत जे उमेदवार यशस्वी झाले आहेत. त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणे गरजेचे असते. त्याचबरोबर यशस्वी उमेदवारांची मार्गदर्शनपर व्याख्याने ऐकावीत. त्यांची विविध मासिके, वर्तमानपत्रे, अनियतकालिके यामधून प्रकाशित झालेल्या मुलाखती वाचाव्यात. यु.पी.एस.सी.परीक्षेसाठी ही परीक्षा नेमकी काय असते, यावर ‘आयएएस प्लॅनर’ व एमपीएससीसाठी ‘एमपीएससी प्लॅनर’ ही दोन पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. ती लक्ष देऊन वाचून काढावी. यामुळे या परीक्षासंदर्भातील आपल्या मनातील बऱ्याच शंकांचे निरसन होऊ शकते.
स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त एम.पी.एस.सी. किंवा यु.पी.एस.सी. नव्हे, तर सर्वप्रथम हे लक्षात घ्या की शासन मग ते राज्य शासन असो अथवा केंद्र शासन रिक्त पदे आणि गरजे अनुसार पदभरती करत असतात. आता ही पदभरती करायची कशी? तर त्यासाठीच सर्वप्रथम वृत्तपत्रे आणि प्रसार माध्यमांवर त्या विभागाद्वारे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात दिली जाते. या जाहिरातीत पात्रतेच्या सर्व अटी आणि सूचना दिलेल्या असतात. या सूचनांचे पालन करून अर्ज मागविले जातात. आता अनेकजण या पदासाठी इच्छुक असतात मग त्या सर्व उमेदवारांमधून त्या पदाकरिता योग्य उमेदवार निवडायचे कसे? त्यासाठीच जी परीक्षा घेतली जाते तिला स्पर्धा परीक्षा असे म्हणतात.
आता प्रत्येक पदाकरिता या स्पर्धा परीक्षेचे स्वरूप वेगवेगळे असते जसे की गृह खात्यात जी पोलीस भरती केली जाते त्या पदासाठी उमेदवार शारीरिक स्वरूपात देखील परिपूर्ण असायला हवा मग अशा पदांसाठी लेखी परीक्षे बरोबरच शारीरिक गुणवत्ता सुद्धा तपासली जाते. स्पर्धा परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान या विषयावर अधिकाधिक प्रश्न पूर्वपरीक्षेपासून मुख्य परीक्षा व मुलाखतीपर्यंत विचारले जातात. त्यामुळे सामान्य ज्ञान या घटकासाठी पाचवी ते बारावीपर्यंतची सर्व पुस्तके काळजीपूर्वक वाचली पाहिजेत. विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रांचे बारकाईने वाचन केले पाहिजे. विशेषत: इंग्रजी वर्तमानपत्रे वाचण्याचा सराव केला पाहिजे. वर्तमानपत्रातील क्रीडा घडामोडींशी संबंधित पान वाचून त्याच्या नोंदी कराव्यात. लोकराज्य, योजना, यशदा-यशमंथन, कुरुक्षेत्र ही मासिके नित्य नियमाने वाचायला हवीत. वर्तमानपत्रे ही सामान्य अध्ययनासाठी त्याचबरोबर निबंधासाठी व मुख्य परीक्षेच्या वैकल्पिक विषयांसाठी फार महत्त्वाचे असतात.
दररोज देश विदेशामध्ये घडणाऱ्या घटनांची माहिती वर्तमानपत्राच्या आधारे मिळू शकते. त्यामुळे अशा स्पर्धा परीक्षांसाठी २० ते २५ टक्के वाटा आहे म्हणून लहानपणापासून मुलांना वर्तमानपत्रे वाचण्याबाबत प्रवृत्त केले पाहिजे. मराठी व इंग्रजी बातम्याही दररोज ऐकल्या पाहिजेत. इंटरनेटच्या माध्यमातून आपणास हवी ती माहिती व मार्गदर्शन उपलब्ध होऊ शकते. स्पर्धा परिक्षेच्या संदर्भात अनेक वेबसाईटवर माहिती उपलब्ध आहे. वेळेचे आणि अभ्यासाचे केलेले नियोजन हे यावेळी सर्वतोपयोगी ठरते.