मोहनदास करमचंद गांधी हे १८८३ सालाच्या सुमारास एका खटल्यासंबंधी दक्षिण आफ्रिकेला गेले होते. त्या ठिकाणी कृष्णवर्णीय लोकांवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात त्यांनी सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब केला आणि कृष्णवर्णीयांना त्यांचे अधिकार मिळवून दिले. त्यानंतर ९ जानेवारी १९१५ साली ते भारतात परतले. भारतात आल्यानंतर त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला एक वेगळी दिशा दिली होती आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. भारतातील या सर्वात मोठ्या प्रवाशाच्या आगमना निमित्त २००३ सालापासून प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. पूर्वी हा दिवस प्रत्येक वर्षी साजरा केला जायचा पण २०१५ सालापासून प्रत्येक दोन वर्षांनी हा दिवस साजरा केला जातो आहे.
मूळचे भारतीय वंशाचे पण सध्या जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात राहत असलेल्या नागरिकांना प्रवासी भारतीय म्हटलं जातं. सरकारच्या एका अहवालाच्या मते, जगभरातील १२० देशांमध्ये जवळपास अडीच कोटी मूळ भारतीय वंशाचे नागरिक वास्तव करत आहेत. या लोकांनी विदेशात राहूनही आपल्या देशाची संस्कृती, भाषा, वारसा, देशाबद्दल असलेला आदर अशा अनेक गोष्टी जपल्या आहेत. या नागरिकांमुळेच जगभरात भारताला एक आगळीवेगळी ओळख मिळते. जगभरात भारताचे नाव बाहेर असणाऱ्या भारतीयांमुळेच प्रचलित आहे.
भारतातून कामासाठी देशाबाहेर गेलेल्या नागरिकांची संख्या आखाती देशामध्ये सर्वात जास्त आहे. भारत सरकारच्या एका अहवालानुसार जवळपास ३० लाख अनिवासी भारतीय आखाती देशात काम करत आहेत. याच प्रदेशातून भारतात सर्वाधिक पैसे पाठवले जातात. त्यानंतर ब्रिटनमध्ये १० लाख अनिवासी भारतीय तर कॅनडामध्ये अडीच लाख अनिवासी भारतीय लोक वास्तवास आहेत. या वर्षीच्या १६ व्या प्रवासी भारतीय दिनाची थीम आहे ‘आत्मनिर्भर भारतामध्ये योगदान’. या निमित्ताने जगभरातील अनिवासी भारतीयांचे एक नेटवर्क तयार करण्यात आले आहे. त्याचा उपयोग भारतात एक सकारात्मक बदल घडवण्यासाठी नक्कीच होणार आहे.
मूळचे भारतीय पण सध्या परदेशात राहत असलेल्या नागरिकांचे देशाच्या विकासात योगदानाचे महत्व लक्षात घेऊन तसेच त्यांची मातृभूमीशी जोडलेली नाळ कायमस्वरूपी टाय अप रहावी या उद्देशाने भारतात ९ जानेवारी या दिवशी प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यात येतो. या निमित्ताने उल्लेखनीय काम केलेल्या अनिवासी भारतीयांना प्रतिष्ठेचा प्रवासी भारतीय पुरस्कारही देण्यात येतो. जगभरात राहणाऱ्या प्रवासी भारतीयांचे भारताच्या विकासात मोठं योगदान आहे. जागतिक बँकेचा मायग्रेशन अॅन्ड रेमिटन्स नावाचा एक अहवाल असं सांगतो की आपल्या मुळच्या देशात पैसे पाठवण्याच्या बाबतीत अनिवासी भारतीयांचा जगात प्रथम क्रमांक लागतोय. याच अहवालात असं सांगण्यात आलंय की २०१९ साली अनिवासी भारतीयांनी देशात ८३.१ अब्ज डॉलर भारतात पाठवले आहेत. त्यामुळे भारताच्या विकासात अनिवासी भारतीयांचा मोठा अमूल्य वाटा आहे