पुणे महापालिकेच्या हद्दीतील शाळा सुरु करण्यास आजपासून परवानगी देण्यात आली आहे. मात्र सुरक्षेचे सगळे निकष पूर्ण करणाऱ्या ६० ते ६५ शाळाच आज पहिल्या दिवशी सुरु करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे बुलाढाण्यातील इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. शहरातील शारदा ज्ञानपीठ या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझर करण्यात येत आहेत. पहिलाच दिवस असल्यानं विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, तसं पालकांच्या संमतीशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश नसल्याचं शिक्षक सांगत आहेत.
तब्बल दहा महिन्यानंतर पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आजपासून शाळेची घंटा पुन्हा एकदा ऐकू आली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षरित्या सुरु करण्यात आले आणि आजपासून दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु झाले आहेत. २३ नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला होता, परंतु, कोरोना परिस्थिती पाहता महापालिका आणि जिल्हा स्तरावर शाळांबाबत निर्णय घेण्याची मुभा सरकारने दिली होती. त्यानुसार आज शाळा सुरु होत आहेत.
मुंबई मध्ये मात्र अद्यापही शाळा सुरु झालेल्या नाहीत. बीएमसीने १६ जानेवारी रोजी पुढील माहिती मिळेपर्यंत शाळा पुन्हा सुरू न करण्याचे निर्देश दिले आहेत. पण राज्यातील इतर भागांत मात्र शाळा आजपासून सुरु करण्यात आल्या आहेत. पुणे, नाशिक, औरंगाबाद, पालघरमध्ये आजपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यात येत आहेत.
नाशिक जिल्ह्यातील २८२५ शाळा आजपासून सुरु करण्यात आल्या असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसह शाळा प्रशासनाकडूनही सर्व खबरदारी घेतली जात आहे. शाळेच्या प्रवेशद्वारावरच विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. शाळेच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलेला असून मधली सुट्टी होणार नसल्याने विद्यार्थ्यांना घरूनच जेवण करून शाळेत यावं लागणार आहे.
विद्यार्थी आणि कमर्चाऱ्यांचं थर्मल स्क्रीनिंग, ऑक्सिमीटर तपासणी यांसारख्या सुरक्षा उपायांचं पालन शाळांमध्ये कराव लागणार आहे. दुसरीकडे शाळेच्या निर्जंतुकीकरणासह कोव्हिडचे नियम पाळणंही बंधनकारक करण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये अनेक उपाययोजना करणं गरजेचं आहे. पालकांचं संमतीपत्र घेऊनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. तशा सूचना पालकांना देण्यात आल्या आहेत. इतक्या महिन्यानंतर शाळेत प्रवेश केल्यावर विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.