तरंदळे धरणाजवळ मोबाईल हरवला, गुपीत उघड होण्याच्या भीतीने प्रेमी युगुलानं जीवन संपवलं

मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ आहेत.

Must read

तरंदळे धरणावर प्रेमी युगुल सोहम व ईश्वरी यांनी दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. ही आत्महत्या ही मोबाईल हरवल्यामुळेच केल्याचे पोलीस तपासामध्ये पुढे येत आहे. सोहम चिंदरकर (22, कलमठ कुंभारवाडी) याने घरातून निघण्यापूर्वी आपल्या आईच्या मोबाईलवरून ईश्वरी राणे (18, कणकवली बांधकरवाडी) हिला व्हॉट्सअॅप मेसेज करत चॅटींग केले आहे. दोघांमध्ये झालेल्या चॅटींगमुळे ही आत्महत्या कोणत्या कारणातून झाली याबाबत पोलिसांनी तपास केला असता प्रथमदर्शनी हरवलेल्या मोबाईलमध्ये असलेली काही गुपीते उघड होण्याची भीती सोहमला झाली होती. त्यामुळे आपण दोघांनीही जीवन संपवूया, असे ईश्वरी हिने म्हटल्याची बाब पोलीस तपासात निष्पन्न होत आहे.

सोहम याने ईश्वरी याला अनेक मेसेज़ केले. यामध्ये माझा मोबाईल हरवला आहे. मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ आहेत. सदर मोबाईल कोणाला मिळाल्यास माझी मोठी बदनामी होईल. त्यामुळे मी माझे जीवन संपवत आहे, असे मेसेज केले आहेत. याचवेळी ईश्वरी ही सोहम याला समजावत असल्याचेही मेसेज मधून दिसून आले आहेत. मात्र, सोहम ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने ईश्वरी हिने, तुझ्याशिवाय मी एकटी कशी जगू? असा प्रश्न उपस्थित करत आपण दोघांनीही एकत्रितरित्या जीवन संपवूया, असे म्हटल्याचे तपासात दिसून येत आहे.

अन् तरंदळे धरणात केली आत्महत्या – सोहमने आईच्या मोबाईलवरुन ईश्वरीला मेसेज करत तरंदळे धरणावर जाऊयात असे कळविले. त्यानुसारच सोहम आणि ईश्वरी यांनी एकत्रितरित्या तरंदळे धरण परिसरात जावून शेवटचा संवाद केला. त्यानंतर पाण्याने भरलेल्या तुडुंब धरणात दोघांनी उडी मारत आत्महत्या केली, असे तपासात पुढे येत आहे. दरम्यान सोहम याचा हरवलेला मोबाईल सापडला की नाही, याविषयी माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. मात्र, सोहमचा मोबाईल सापडल्यास चॅटींगमध्ये झालेल्या संवादानुसार अनेक प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासात उघड होण्याची शक्यता आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article