रत्नागिरी जिल्ह्यातील पावस परिसरात यावर्षी काजू पिकासाठी सुरुवातीपासूनच पोषक वातावरण लाभल्याने काजू हंगामाला जोमाने सुरुवात झाली आहे. मोहोर चांगल्याप्रकारे आल्यानंतर आता फळधारणाही समाधानकारक झाली असून, बाजारात काजू बी ची आवक सुरू झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उत्पादन मर्यादित असले तरी, सुरुवातीलाच काजू बियाला किलोला १५० ते १६० रुपये दर मिळत आहे, तर ओल्या काजुगराला किलोला १२०० ते १५०० रुपये मोजावे लागत आहेत. यावर्षी पावसाने उशिरापर्यंत हजेरी लावली होती; मात्र पावसाने विश्रांती घेताच कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली. थंडीतील सातत्यामुळे काजूपिकाला आवश्यक असलेले पोषक हवामान तयार झाले. यामुळे झाडांना मोहोर चांगला आला आणि फळधारणेची प्रक्रियाही वेगाने पार पडली.
सध्या बागांमध्ये काजू तयार झाला असून, बागायतदारांनी पीक काढणीवर भर दिला आहे. काजूच्या दराबाबत बोलायचे झाले तर गेल्या वर्षी काजूला चांगला बाजारभाव मिळाला होता. यंदा हंगामाच्या सुरवातीलाच कच्च्या काजू बियाला प्रतिकिलो १५० ते १६० रुपये असा दर मिळत आहे. हा दर पुढील काही काळ स्थिर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच ओले काजूगर १५०० ते २ हजार रु किलोने विकले जात आहेत. काजू बियांचा दर समाधानकारक असल्याने अनेक बागायतदारांनी आपला माल स्थानिक बाजारपेठेत आणि काजू फॅक्टरींमध्ये विक्रीसाठी नेण्यास सुरुवात केली आहे. उत्पादनाचे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत थोडे कमी असले तरी, मिळणाऱ्या चांगल्या दरामुळे उत्पादनातील घट भरून निघेल, अशी अपेक्षा बागायतदार व्यक्त करत आहेत.
