रत्नागिरी तालुक्यातील निरूळ गावचे आंबा बागायतदार प्रदीप आंब्रे यांच्या आंबा बागेतील पहिली हापूस आंब्याची पेटी पुणे येथील मार्केटमध्ये पाठवण्यात आली. त्यांच्या पहिल्या तीन डझनच्या पेटीला बारा हजार रुपये दर मिळाला आहे. पांडुरंग आंब्रे हे सुरुवातीला मुंबई मार्केटमध्ये हापूस आंब्याची विक्री करत होते. त्यानंतर त्यांचा मुलगा प्रदीप यांनी पुणे येथे थेट ग्राहकांना विक्री करण्यास सुरुवात केली. त्या वेळी त्यांना बाजारपेक्षा चांगला दर मिळाला. त्यामुळे त्यांनी थेट विक्रीलाच प्राधान्य दिले आहे.
यावर्षी पाऊस लांबल्याने आंबा हंगामासंदर्भात थोडीफार धाकधूक होती; परंतु पाऊस थांबल्यावर लगेच मोठ्या प्रमाणात थंडी पडली. त्यामुळे आंब्याला पोषक वातावरण होते, असे आंब्रे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘यावर्षी ३० जानेवारीला म्हणजे दरवर्षीच्या अगोदरच हापूस आंबा चांगल्या तन्हेने तयार झाला. तो काढून पुणे येथील मार्केटमध्ये तीन डझनाचा हापूस आंबा पाठवला. त्याला मार्केटमध्ये चार हजार रुपये डझनाचा भाव मिळाला. तसेच ‘रत्’ना जातीचा ११ डझन आंबा मार्केटमध्ये पाठवला. त्यालाही दोन हजार रुपये डझनप्रमाणे भाव मिळाला.
