कशेळी येथील श्री कनकादित्य सूर्यमंदिर हे केवळ एक श्रद्धास्थान नसून ते कोकणातील सौरपंथाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे केंद्र असल्याचा शोध महाड येथील पुरातत्त्वशास्त्र अभ्यासक डॉ. अजय धनावडे यांनी लावला आहे. या संशोधनातून आडिवरे हेच ‘प्राचीन आदित्यवाड’ असल्याचे सिद्ध झाले असून, सुमारे १३०० वर्षांपासूनची अखंड सूर्योपासनेची परंपरा अधोरेखित झाली आहे. बदामी चालुक्य काळातील सूर्यमूर्ती मूर्तीशास्त्राच्या आधारे केलेल्या अभ्यासानुसार, काळ्या पाषाणातील ही सूर्यमूर्ती इसवी सनाच्या सातव्या शतकाच्या मध्यकाळातील (सुमारे इ.स. ६५०) असावी, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मूर्तीवरील करंडक मुकुट, हातातील पद्म आणि प्रभावलय ही वैशिष्ट्ये बदामी चालुक्य काळातील सूर्यप्रतिमांशी मिळतीजुळती आहेत.
ताम्रपटातील ‘आदित्यवाड’चा पुरावा संशोधनानुसार, बदामी चालुक्य सम्राट विक्रमादित्य (दुसरा) याने शके ६६४ (इ.स. ७४१-७४२) मध्ये दिलेल्या नरवण ताम्रपटात ‘आदित्यवाड’ येथे वास्तव्य करून दान दिल्याचा उल्लेख आहे. याच आदित्यवाडचे रूपांतर ‘अट्टविरे’ आणि पुढे आजच्या ‘आडिवरे’मध्ये झाले. विशेष म्हणजे, त्या काळात मकर संक्रांत हा सण डिसेंबरमध्ये येत होता, हे देखील या अभ्यासातून समोर आले आहे. संशोधनाला पुणे येथील संस्थांची मान्यता डॉ. धनावडे यांचे हे संशोधन पुणे येथील प्रसिद्ध ‘भांडारकर प्राच्यविद्या संस्था’ आणि ‘भारत इतिहास संशोधन मंडळ’ येथे प्रकाशित झाले आहे. या संशोधनामुळे कोकणच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवावर नवा प्रकाश पडला आहे. कशेळी हे आडिवरे गावाचाच एक प्राचीन भाग असून, कनकादित्याची स्थापना याच वैभवशाली परंपरेतून झाली असल्याचे संशोधनात म्हटले आहे.
आख्यायिका आणि वास्तव – स्थानिक आख्यायिकेनुसार, ही मूर्ती गुजरातमधील प्रभासपाटण येथून समुद्रमार्गे एका सूर्योपासक गणिकेने आणली आणि ‘कनकेचा आदित्य म्हणून ‘कनकादित्य’ नाव रूढ झाले. मात्र, मूर्तीशास्त्रीय लक्षणधिकान ही अलौकिक मूर्ती स्थानिक रित्याच घडवली गेली असल्याचे डॉ. धनागडे यांनी संशोधनात स्पष्ट केले आहे.
