राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाचा कारभार आणखी प्रभावी आणि वेगवान होणार आहे. शासनाने विभागाच्या कर्मचारी रचनेचा (आकृतिबंध) पूर्ण आढावा घेऊन त्यात सुधारणा केल्या आहेत. यामुळे नवीन कर्मचाऱ्यांची भरती होईल आणि विभागाची कामकाज क्षमता वाढेल. सुधारित आकृतिबंधानुसार, एकूण १ हजार ३९७ पदे निश्चित करण्यात आली आहेत. यात १ हजार ५९ नियमित पदे आणि ३३८ बाह्य स्रोतातील पदांचा समावेश आहे. मंत्री नीतेश राणे यांनी मत्स्य व्यवसाय विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर या आकृतिबंधासाठी सातत्यपूर्ण पाठपुरा केला. त्यामुळे २००७ नंतर प्रथमच कर्मचारी भरती करण्याचा हा आकृतिबंध या खात्यात मंजूर झाला आहे.
पूर्वी विभागात १ हजार ५० पदे मंजूर होती. त्यातील ८२ पदे २०२३ मध्ये रद्द करण्यात आली होती. आता उरलेल्या ९६८ पैकी ११ पदे रद्द करून ४४० नवीन पदे (३८० नियमित आणि ६० बाह्य स्रोत) मंजूर करण्यात आली आहेत. यामुळे विभागाची एकूण मनुष्यबळ संख्या १ हजार ३९७ पर्यंत पोहोचली.
नवीन पदनिर्मिती, भरती होणार – ३८० नियमित नवीन पदे निर्माण करण्यात आली असून ११ जुनी पदे रद्द करण्यात आली आहेत. रिक्त आणि व्यपगत पदे पुनरुज्जीवित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. प्रकल्प व्यवस्थापक, कोळंबी बीज उत्पादन केंद्र, दापचरी” हे पद रद्द करून, तेथे मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी प्रमुख म्हणून काम पाहतील.
