कोकण किनारपट्टीवर मुंबई ते विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) दरम्यान १ मार्चपासून ‘रो पॅक्स’ प्रवासी जलवाहतुकीची फेरी सेवा सुरू करण्याची घोषणा राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरविकास मंत्री नीतेश राणे यांनी केली. या नवीन सुविधेमुळे मुंबई आणि कोकणदरम्यान सागरीमागनि जलद, आरामदायी व आनंददायी प्रवास उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाने या मार्गावर फेरी सेवा चालवण्यासाठी ‘एमटूएम फेरीज् प्रा.लि.’ या प्रदीर्घ अनुभव असलेल्या संस्थेला परवानगी दिली आहे. ही संस्था सध्या मुंबई ते मांडवादरम्यान यशस्वीपणे सेवा देत आहे. या सेवेसाठी ‘एमरएम प्रिन्सेस’ हे आधुनिक व सर्वसुविधांनीयुक्त जहाज चालवले जाणार असून, एका फेरीमध्ये ६२० प्रवासी व ३५ वाहने वाहून नेण्याची या जहाजाची क्षमता आहे. या सेवेद्वारे अवघ्या ६ ते ७ तासांत मुंबईहून विजयदुर्ग येथे पोहोचता येणार आहे. या सुविधेचे उद्घाटन सोहळा १ मार्चला सकाळी ८ वा. मुंबई येथून मंत्री नीतेश राणे यांच्या उपस्थितीत होईल.
या फेरीसेवेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. मुंबईहून दर बुधवारी व शनिवारी सकाळी ८ वा. प्रस्थान होईल, तर विजयदुर्गहून दर गुरुवारी व रविवारी दुपारी १२ वा. जहाज सुटेल. प्रवासासाठी इकॉनॉमी क्लासचे भाडे तीन हजार रुपये, प्रीमियम इकॉनॉमी पाच हजार रु., बिझनेस क्लास सात हजार रु. आणि फर्स्ट क्लाससाठी ९ हजार रु. आकारले जातील. वाहनांच्या वाहतुकीसाठी दुचाकीचे भाडे १ हजार रु., सायकल ६०० रु., तर कारसाठी त्यांच्या आकारानुसार ७ ते ९ हजार रुपयांपर्यंत भाडे असेल. या फेरीसेवेसाठी तिकीटविक्री सुरू झाली असून, नागरिक www.m2mferries. com या संकेतस्थळावर जाऊन बुकिंग करू शकतात.
