रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आगामी काही दिवसांत तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, १२ फेब्रुवारीपासून पुढील तीन दिवसांत कमाल तापमानात सुमारे २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होऊन ते ३४ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या बदलत्या हवामानाचा विचार करून कोकण कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी पीकनिहाय विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. उन्हाचा कडाका वाढत असल्याने नव्याने लागवड केलेल्या आंबा कलमांच्या बुंध्याला ‘बोर्डो पेस्ट’ लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे, जेणेकरून खोडाची साल तडकू नये. आंबापिकामध्ये फळधारणा झाली असल्यास प्रतिझाड १५० ते २०० लिटर पाणी १५ दिवसांच्या अंतराने द्यावे.
तसेच, आंबा मोहोर आणि फळांचे तुडतुडे, फुलकिडे व फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी विद्यापीठाने शिफारस केलेल्या वेळापत्रकानुसार कीटकनाशकांची फवारणी आणि ‘फळमाशी रक्षक सापळे’ लावण्याचे आवाहन केले आहे. काजूपिकावर ‘टी मॉस्किटो बग’ (काजूवरील ढेकण्या) आणि फुलकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने लॅम्बडा सायहॅलोथ्रीन किंवा प्रोफेनोफॉसची फवारणी करणे आवश्यक आहे. नारळ आणि सुपारीच्या माडांना जमिनीच्या मगदुरानुसार ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे आणि नारळाच्या पाच वर्षांवरील माडांना खतांची तिसरी मात्रा देऊन लगेच पाणी द्यावे.
