इटलीतून हद्दपार करण्यात आलेला विनाशकारी रासायनिक प्रकल्प चिपळुणातील लोटे औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्ध होताच महायुती सरकारची अक्षरशः पळापळ झाली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहा अधिकाऱ्यांचे पथक मुंबईतून तातडीने लोटे येथे दाखल झाले आहे. दरम्यान, लक्ष्मी ऑरगॅनिक्स कंपनीने हा प्रकल्प उभारला असून या प्रकल्पामुळे प्रदूषण होणार की नाही, याचा अहवाल एमपीसीबीने कंपनीकडेच मागितल्याची बाब समोर आली आहे. अजब सरकारच्या या गजब कारनाम्यांवर कोकणातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बंद पडलेल्या आणि न्यायालयीन इटलीमध्ये घातक प्रदूषणामुळे कारवाईला सामोरी गेलेल्या मिटेनी एस.पी.ए. या रासायनिक कंपनीची यंत्रसामग्री भारतीय कंपनी लक्ष्मी ऑरगॅनिक्स इंडस्ट्रीजच्या विवा लाइफसायन्सेस या उपकंपनीने खरेदी करून लोटे येथे वापरात आणली आहे. याविषयीचा व्हिडीओ व्हायरल झाल तसेच वर्तमानपत्रांमध्ये बातम्याही प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे चिपळूणसह कोकणात खळबळ माजली. लोटे परिसर आधीच औद्योगिक प्रदूषणामुळे संवेदनशील मानला जातो. त्यातच पीएफएएससारख्या रसायनांचे उत्पादन झाल्यास वशिष्ठी नदी, भूगर्भातील पाणी आणि मानवी आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होण्याची भीती स्थानिकांनी आणि पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली.
इटलीत प्रदूषणास कारणीभूत ठरलेलीच जुनी यंत्रसामग्री येथे वापरली जात असल्याने या अटींच्या अंमलबजावणीवरही पर्यावरणतज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केलेः गंभीर बाब म्हणजे लोटेतील या कंपनीने जूनपासून चाचण्या सुरू केल्या आहेत. या चाचण्यांमधील टाकाऊ काऊ लिक्विड विघटनासाठी तळोजा येथे पाठवण्यात आल्याची बाब समोर आली आहे. ४ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने चाचण्यांचा अहवाल देण्याची नोटीस दिली होती. तो अहवाल तज्ज्ञ समिती स्थापून त्यांच्याकडे पाठवला जाईल. या समितीकडून खात्रीशीर अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेऊ, असे एमपीसीबीचे अधिकारी सांगत आहेत.
सहा अधिकाऱ्यांचे पथक – कंपनी प्रदूषणकारी असल्याचे अनेक व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने दुसऱ्यांदा लोटे गाठले आहे. मुंबई मुख्यालयातून सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक सोमवारी लोटे येथे कंपनीत दाखल झाले. या पथकाकडून कंपनीची चौकशी सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. लोटे वसाहतीमधून तळोजा येथे वेस्ट केमिकल घेऊन जाणारे वाहतूकदार यांनी याआधी रसायन कशेडी घाटात आणि बोरज धरणात सोडले असल्याच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत. कोकणात सीईटीपी आणि घातक कचऱ्याचे वाहतूकदार हे नियम आणि कायद्याचे उल्लंघन करत असल्यामुळे पर्यावरणीय समस्या निर्माण होत आहेत. दरम्यान, सर्व वैधानिक प्रक्रिया प्रत्यक्षात पाळल्या जातील याची खात्री एलआयओएल कशी देईल?, असा उलट प्रश्न कंपनीचे साईट हेड पाटील यांनी केला.
