महायुतीतील जागावाटप हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण समन्वयाने ठरले आहे. या निवडणुकीत पक्षशिस्त पाळणे आणि एकमेकांवरील विश्वास टिकवून ठेवणे, हाच आपल्या विजयाचा खरा पाया आहे, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री सामंत यांच्या उपस्थितीत महायुतीची समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातील सर्व जागांवर एकसंघपणे आणि विजयाच्या निर्धाराने लढण्याचा संकल्प करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना मंत्री सामंत म्हणाले, एकत्रित काम केल्यास काय परिणाम साधता येतो, हे आपण यापूर्वी सिद्ध केले आहे. तोच आत्मविश्वास आणि ऊर्जा घेऊन आपल्याला जनतेसमोर जायचे आहे.
या जागांवर मिळणारा विजय हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सक्षम नेतृत्वावर जनतेने टाकलेला विश्वास असेल, याप्रसंगी रत्नागिरी तालुक्यातील १० जिल्हा परिषद गट आणि २० पंचायत समिती गणांमध्ये महायुतीचे उमेदवार विजयी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या बैठकीला भाजपचे प्रभारी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, शहराध्यक्ष दादा ढेकणे, महिला अध्यक्ष वर्षा ढेकणे, . शिवसेनेकडून जिल्हाध्यक्ष राहुल पंडित, विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुदेश मयेकर, तालुकाध्यक्ष बंड्याशेठ साळवी, बाबू म्हाप, संजू साळवी, अॅड. विलास पाटणे आदी उपस्थित होते.
