मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक ठिकाणी संथगतीने सुरू आहे. त्यामुळे महामार्गाला उशीन होत आहे. पुलांची कामे रखडली आहेत. जोडरस्त्याचा भराव करण्यासाठी बावनदीमध्ये हे वारेमाप गाळाचे उत्खनन सुरू आहे. नदीत रस्ता करून जेसीबीने गाळ खणून काढल्याचा उघडउघड प्रकार सुरू आहे; परंतु प्रशासन मात्र याकडे कानाडोळा करताना दिसत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम संगमेश्वर ते लांज्यापर्यंत अनेक ठिकाणी सुरू आहे. त्यातही संगमेश्वर ते बावनदीदरम्यान पाच ते सहा ठिकाणी काम सुरू आहे. त्यातच संगमेश्वर आणि बावनदी, कोळंबे या भागात पुलांच्या भरावाचे काम हाती घेण्यात आले आहे.
बावनदीच्या जोडरस्ता भरावासाठी थेट बावनदीमध्येच खड्डे खणले जात आहेत. बावनदीच्या पात्रात रस्ता करून जेसीबीच्या सहाय्याने गाळ काढला जात असून, हा गाळ भराव म्हणून रस्त्याला वापरला जात आहे. हा गाळ काढण्याची परवानगी प्रशासनाने ठेकेदाराला दिली आहे का, असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. बावनदीमध्ये पुलापासून काही भागात गाळ उपशामुळे मोठे खड्डे पडले आहेत. भविष्यात गुरे घेऊन जाणारे किंवा मच्छीमारीसाठी जाणाऱ्या ग्रामस्थांसाठी हे खड्डे धोकादायक ठरणार आहेत.
