शहरालगतच्या आणि अनेक वर्षांची प्रतीक्षा असलेल्या एमआयडीसी भागात जिल्हा क्रीडा संकुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. तब्बल २३ कोटी रुपये खर्च करून उभारले जाणारे हे संकुल जिल्ह्यातील खेळाडूंसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणार आहे. सध्या या ठिकाणी इनडोअर स्टेडियम, सुशोभीकरणाचे आणि पायाभूत सुविधांची कामे प्रगतिपथावर आहेत. या ठिकाणी १३ पासून पोलिस भरतीची प्रक्रिया चालणार आहे. जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामाचे भूमिपूजन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले होते. म्हणजे पंधरा वर्षांपूर्वी या संकुलाचे काम सुरू झाले होते; मात्र मधल्या काळात निधीअभावी हे काम रडतखडत सुरू होते. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या विशेष पाठपुराव्यामुळे या प्रकल्पासाठी २९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
त्यापैकी ७ कोटी रुपये मारुती मंदिर येथील संकुलासाठी खर्च झाल्यानंतर उर्वरित २३ कोटी रुपये आता एमआयडीसीतील ११.५० एकर जागेत उभारल्या जाणाऱ्या मुख्य जिल्हा क्रीडा संकुलासाठी वापरले जात आहेत. रत्नागिरीत येणाऱ्या खेळाडू आणि शिक्षकांसाठी निवासाची मोठी अडचण भासत होती. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी संकुल परिसरात ५०० बेडचे भव्य वसतिगृह १०० खोल्यांचे) उभारण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. येत्या दोन वर्षांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. या संकुलाचे मुख्य आकर्षण म्हणजे ५७ बाय ३२ मीटर आकाराचे भव्य इनडोअर क्रीडांगण असणार आहे. त्यासाठी ३.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या क्रीडांगणाचे काम आता युद्धपातळीवर सुरू आहे. आजपासून होणारी पोलिस भरती या क्रीडांगणावर होणार आहे.
