महामार्गावरील संगमेश्वर-भाभळे गावांना जोडणारा सोनवी पूल उभारून ९४ वर्षे पूर्ण झाली असताना, चौपदरीकरणात प्रस्तावित नवीन सोनवी पुलाचे काम गेली चार वर्षे अत्यंत संथगतीने सुरू आहे. संगमेश्वर बसस्थानक, सोनवी चौक या ठिकाणी वारंवार होणारी वाहतूककोंडी, अपघातांचा धोका आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे स्थानिक, वाहनचालक अक्षरशः हैराण झाले आहेत. संगमेश्वर बसस्थानक पुलालगतच असल्याने अरुंद पुलावर दोन्ही बाजूंनी मोठी वाहतूक कोंडी होते. अनेकदा एक ते दीड तास वाहनांच्या रांगा लागतात. येथे करण्यात आलेल्या खोदाईमुळे उडणारी प्रचंड धूळ बसस्थानक, बाजारपेठ, दुकानांवर बसत आहे. त्यामुळे सगळीकडे धुळीचे साम्राज्य दिसून येत असून, आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत.
संगमेश्वर चौपदरीकरणाला परिसरात आठ वर्षांपूर्वी सुरुवात झाली; मात्र नवीन सोनवी पुलाचे काम प्रत्यक्षात मार्च २०२२ मध्ये सुरू झाले. सुरुवातीचे तीन महिने काम झाल्यानंतर जून २०२२ मध्ये काम बंद पडले आणि तब्बल नऊ महिने ते ठप्प राहिले. त्यानंतरही गेली चार वर्षे काम अत्यंत कूर्मगतीने सुरू असून, केवळ दिवसा मोजक्याच कामगारांवर काम केले जात आहे. सुरक्षेच्या नियमांकडेही सर्रास दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
