आपण आज अशा युगात जगत आहोत जिथे रस्ता शोधण्यासाठी गुगल मॅप्स, हिशोबासाठी कॅल्क्युलेटर आणि आता प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी चॅट जीपीटी सारखी एआय (AI) साधने वापरतो. सुरुवातीला आपल्याला वाटले की एआय फक्त आपली कामे सोपी करत आहे, पण आता शास्त्रज्ञांनी एक धक्कादायक इशारा दिला आहे. त्यांच्या मते, आपण नकळतपणे आपली विचार करण्याची क्षमता एआयच्या हवाली करत आहोत, ज्याला तांत्रिक भाषेत ‘कॉग्निटिव्ह क्रीप’ (Cognitive Creep) किंवा ‘मानसिक घुसखोरी’ म्हटले जाते.
डायरी आणि एआयमधील फरक काय? पूर्वी आपण आठवणींसाठी डायरी किंवा गणितासाठी कॅल्क्युलेटर वापरायचो. ही साधने आपल्याला मदत करायची, पण विचार आपल्यालाच करावा लागायचा. मात्र, एआय आता विश्लेषण करणे, नवनिर्मिती करणे आणि निर्णय घेणे यांसारखी मानवी कामे करू लागली आहे. यामुळे आपण स्वतःचा मेंदू वापरणे कमी केले आहे.
‘कॉग्निटिव्ह सरेंडर’: आपण विचार करणे थांबवले आहे का? पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील संशोधक स्टीव्ह शॉ यांनी एक भीती व्यक्त केली आहे, ती म्हणजे ‘कॉग्निटिव्ह सरेंडर’. जेव्हा आपण एआयने दिलेले उत्तर न पडताळता किंवा त्यावर विचार न करता स्वीकारतो, तेव्हा आपण आपले मानसिक स्वातंत्र्य गमावतो. एका अभ्यासात असे दिसून आले की, अनेक वकील एआयच्या चुकांमुळे अडचणीत आले, तरीही ते निर्णयांसाठी त्याच तंत्रज्ञानावर अवलंबून राहत आहेत.
तज्ज्ञ बनण्याची प्रक्रिया धोक्यात एखाद्या विषयात तज्ज्ञ होण्यासाठी मेहनत, सराव आणि चुकांमधून शिकणे आवश्यक असते. पण जर प्रत्येक गोष्ट एआय तयार करून देत असेल, तर नवीन पिढी कष्टाने एखादी गोष्ट शिकण्याऐवजी शॉर्टकट शोधत आहे. यामुळे भविष्यात खऱ्या अर्थाने ‘तज्ज्ञ’ लोकांची कमतरता भासू शकते.
एआयच्या युगात स्वतःची बुद्धी कशी टिकवाल? १. आधी स्वतःचा विचार करा: कोणत्याही कामासाठी एआयची मदत घेण्यापूर्वी किमान १० मिनिटे स्वतःच्या बुद्धीने विचार करा. २. एआयला ‘साधन’ समजा, ‘मालक’ नाही: एआयचा वापर आपली क्षमता वाढवण्यासाठी करा, त्यावर पूर्णपणे विसंबून राहण्यासाठी नाही. ३. वैयक्तिक ओळख जपा: जी कामे तुमच्या कल्पकतेशी आणि ओळखीशी संबंधित आहेत (उदा. लेखन, संवाद), ती शक्यतो स्वतःच करा.
तंत्रज्ञान प्रगतीसाठी नक्कीच आहे, पण आपली बुद्धी आणि विचार करण्याची ताकद गहाण ठेवून मिळवलेली ही प्रगती घातक ठरू शकते.
