राज्यावर ओढवलेल्या कोरोना संकटामुळे बॉलिवूड कलाकार गेल्या काही दिवसांपासून ट्रोल होत होताना दिसत आहेत. एकीकडे राज्यातली, देशातली स्थिती एवढी गंभीर होत असताना, कलाकार देश सोडून परदेशात जाऊन राहू लागले. पत्रकरांनी बऱ्याच जणांना एअरपोर्ट वर स्पॉट केल्याने अनेक कलाकारांनी त्यावरून कानउघडणी केल्यानंतर आता हिंदी कलाकारांना जाग येऊ लागली आहे. प्रत्येक जण कोविडसाठी मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. अक्षयकुमार, आयुषमान खुराना, अजय देवगण, सोनू सूद यांनी आता कोविडसाठीच्या विविध योजनांसाठी विविध मार्ग अवलंबले असून आता उपचारांसाठी नक्कीच गती येईल, अशी त्यांना खात्री आहे.
अजय देवगण शिवाजी पार्कमधील भारत अँड स्काउट्स गाईड हॉलमध्ये 20 खाटांच रुग्णालय उभारणार आहे. त्यासाठी अजय देवगणने त्याच्या एनवाय फाउंडेशन मार्फत त्या उभारणीसाठी मदत देऊ केली आहे. गेल्यावर्षी देखील अजयने धारावीमधील कोव्हिड सेंटर उभारणीसाठी मदत केली होती. अजय पाठोपाठ आता अक्षयकुमार आणि ट्विंकल खन्नाही मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या वर्षी पहिल्या लाटेमध्ये त्यांनी दिल्लीतल्या गौतम गंभीर फाउंडेशनला एक कोटीची मदत जाहीर केली होती. आता मुंबईत अक्षयकुमार आणि ट्विंकल यांनी लंडनहून मागणी करून 120 ऑक्सिजन सिलिंडर्सची मदत केली आहे. ट्विंकलने सोशल मीडियावरून ही माहिती शेअर केली आहे.
दुसरीकडे आयुषमान खुरानाने आपल्या पत्नीच्या सहाय्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक मदत दिली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करून त्याने ही माहिती उघड केली आहे. शिवाय त्याने इतर कलाकारांनाही शक्य तेवढ्या मदतीचं आवाहन केलं आहे.
अभिनेता सोनू सूद सोशल मिडियावर कायम मदतीसाठी पुढे असेतो. स्वतः कोरोना निगेटिव्ह आल्यानंतर जोमाने पुन्हा एकदा तो राज्यातील परिस्थितीमध्ये मदतीला धावून गेला आहे. सोनू सूद फाउंडेशनच्यावतीने त्याने कोविड-19 फ्री हेल्प सेंटर उभारलं आहे. यामध्ये डॉक्टरांशी सल्ला मसलत आणि कोविड टेस्टचा समावेश करण्यात आला आहे. सोनू कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये जेवढी शक्य आहे तेवढी मदत केलेली सगळ्यांना ज्ञातच आहे. आता कोरोनाच्या दुसऱ्या लातेची गंभीरता लक्षात घेऊन मदतीसाठी हे मोफत सल्ला केंद्र त्याने उभारलं आहे.
अक्षय पाठोपाठ आता सुनील शेट्टीनेही केव्हीएन फाउंडेशनसोबत हातमिळवणी करून ऑक्सिजन सिलेंडर्स उपलब्ध करून देण्याच ठरवलं आहे. मुंबई आणि बंगलोरमध्ये हे ऑक्सिजन सिलेंडर पोहोचवले जाणार आहेत. लॉकडाऊन असताना सुद्धा सेलिब्रिटी राज्यांत न थांबता, देशाबाहेर जाण्याकडे त्यांचा कल दिसल्याने जनतेकडून त्यांना मोठ्या प्रमाणावरून ट्रोल करण्यात आले.