Homesindhudurgकास दाभाळवाडीत बिबट्याची दहशत मुक्त संचारामुळे ग्रामस्थ भयभीत

कास दाभाळवाडीत बिबट्याची दहशत मुक्त संचारामुळे ग्रामस्थ भयभीत

बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले करण्याचे प्रमाणही वाढले आहे.

कास-दाभाळवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर लक्षणीयरीत्या वाढल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळच्या सुमारास सुरू होणारा बिबट्याचा संचार थेट पहाटेपर्यंत सुरू राहत असून, तो मुक्तपणे वावरताना अनेक वेळा ग्रामस्थांच्या निदर्शनास आला आहे. परिणामी, रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. या भागात बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले करण्याचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या काही दिवसांत मांजरी, शेळ्या यांसारख्या पाळीव प्राण्यांना बिबट्याने भक्ष्य बनविल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीती पसरली असून, लहान मुले, वृद्ध आणि महिला यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, कास ग्रामपंचायतीचे सदस्य अजय भाईप यांनी वनविभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बिबट्याचा वावर वाढल्याची माहिती दिल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केवळ एकदाच परिसरात फेरी मारली; मात्र त्यानंतर कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, असा आरोप त्यांनी केला. ग्रामस्थांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अनेकदा फोन उचलले जात नसल्याचाही दावा त्यांनी केला आहे. जर या परिसरात एखादी जीवितहानी झाली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार; असा थेट सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. वनविभागाने केवळ थातूरमातूर कारवाई न करता तातडीने पिंजरा लावणे, गस्त वाढवणे, नागरिकांमध्ये जनजागृती करणे यांसारख्या ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

बिबट्यापासून घ्यावयाची काळजी – रात्री एकट्याने बाहेर जाणे टाळावे. लहान मुले व वृद्धांना सायंकाळनंतर घराबाहेर सोडू नये. पाळीव प्राणी रात्री घराबाहेर मोकळे सोडू नयेत. घराभोवती अनावश्यक झाडी व अंधार राहणार नाही याची दक्षता घ्यावी. टॉर्च, लाईटचा वापर करूनच बाहेर पडावे. बिबट्या दिसल्यास त्याच्याकडे धाव घेऊ नये, किंवा दगडफेक करू नये.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments