मुंबईतील वाकोला परिसरातून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना अवघ्या काही तासांत यश आले आहे. ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत रत्नागिरी रेल्वे स्थानकावर नेत्रावती एक्सप्रेसम ध्ये या मुलींना ताब्यात घेण्यात आले. दोन्ही मुलींना सुरक्षितरीत्या वाकोला पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आले आहे. ही कामगिरी बजावणाऱ्या पोलिस पथकाचे अभिनंदन करण्यात येत आहे. या विषयी अधिक वृत्त असे की बृहन्मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार तेथील पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अन्वये (गु.र.नं. १४६/२०२६) गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मुलींचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस युद्धपातळीवर प्रयत्न करत होते.
नेत्रावती एक्सप्रेसने गोव्याला – सदर मुली नेत्रावती एक्सप्रेसने गोव्याच्या दिशेने प्रवास करत असल्याची गोपनीय माहिती रत्नागिरी पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीचे गांभीर्य ओळखून रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला कारवाईचे आदेश दिले.
रेल्वे स्थानकावर सापळा – मिळालेल्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक तात्काळ रत्नागिरी ‘रेल्वे स्थानकावर दाखल झाले. नेत्रावती एक्सप्रेस स्थानकात येताच पोलिसांनी ‘ऑपरेशन. मुस्कान’ अंतर्गत डब्यांची तपासणी सुरू केली. यावेळी संशयास्पदरीत्या प्रवास करणाऱ्या दोन मुली पोलिसांना आढळल्या. अधिक चौकशी केली असता, या वाकोला येथून बेपत्ता झालेल्या मुलीच असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे वाकोला येथून अपहरण करण्यात आले होते. ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ही यशस्वी कारवाई करण्यात आली.
या पथकाने बजावली कामगिरी – ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन हेदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विजय आंबेकर (पोहेकॉ/९०९), दिपराज पाटील (पोहेकॉ/१४०७), स्वाती राणे (मपोहेकॉ/१२१०) यांनी ही कामगिरी केली. दोन्ही मुलींची सुरक्षित सुटका करून त्यांना पुढील कार्यवाहीसाठी वाकोला पोलीस ठाण्याच्या पथकाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. रत्नागिरी पोलिसांच्या या तत्परतेमुळे पालकांनी आणि नागरिकानीं पोलिसांचे आभार मानले आहेत.
