मालगुंडला प्राणीसंग्रहालय होतेय, ही अतिशय चांगली, मला आवडलेली कल्पना आहे. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या रत्नागिरीत अधिकाऱ्यांनीही सौंदर्यपूर्ण दृष्टिकोनातून स्मार्ट सिटीची कामे करून भर घालावी, असे सांगत सिंधुरत्न योजनेला मुदतवाढ मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव तथा पालकसचिव सीमा व्यास यांनी दिले. जिल्ह्यातील १०० कोटी आणि त्यापेक्षा अधिकच्या कामांच्या अनुषंगाने तसेच नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत प्रस्तावित कामांबाबत श्रीमती व्यास यांनी आज आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मनुज जिंदल, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.
एमएसआरडीसीने वेळेत कामे पूर्ण करा – एमएसआरडीसीने नियोजित वेळेत आणि नियोजित बजेटमध्ये कामे पूर्ण करावीत. नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्ह्याच्या वैभवात भर घालणारी वैशिष्ट्यपूर्ण कामे असावीत. नित्याची नेहमीची कामे नसावीत. सुधारित भात, नाचणी बियाणांचे वितरण केलेल्या शेतकऱ्यांकडून कृषी विभागाने माहिती घेवून तांत्रिक दृष्ट्या संशोधनात्मक अहवाल सादर करावा, असेही श्रीमती व्यास यांनी सांगितले.
