रत्नागिरीतील विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून, टर्मिनल बिल्डिंगचे कामही वेगाने पूर्ण होत आहे. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच रत्नागिरी विमानतळ प्रवाशांसाठी सुरू होईल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. रत्नागिरी येथील दौऱ्यात त्यांनी पालिकेच्या इमारतीची पाहणी केली. जिल्ह्याच्या दळणवळण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या रत्नागिरी विमानतळाचा आढावा सामंत यांनी या वेळी घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजकीय घडामोडींवर भाष्य करताना उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची युती झाली होती, त्याच वेळी राज ठाकरेंचा विश्वासघात होईल आणि त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला जाईल, असे भाकीत मी केले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. मुंबईतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून हे आता स्पष्ट झाले आहे. मैत्री आणि राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत; मात्र काही लोकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या मैत्रीपूर्ण भेटीचा जळफळाट होत असून, त्यातूनच पोटशूळ उठत असल्याची टीका त्यांनी केली. शक्तिपीठ महामार्गाबाबत भूमिका स्पष्ट करताना सामंत म्हणाले की, हा महामार्ग राज्यासाठी ‘गेमचेंजर’ ठरणार आहे. राज्यातील प्रमुख शक्तीपिठे या मार्गावर असल्याने त्याला हे नाव देण्यात आले आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणेच हा प्रकल्प यशस्वी केला जाईल; मात्र, हा प्रकल्प राबवताना कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय केला जाणार नाही. शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रशासन पुढे जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
