कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’ सध्या एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. स्वामींच्या लीला आणि भक्ताप्रती असलेली त्यांची माया प्रेक्षकांना नेहमीच भावते. पण आता मालिकेत एक असा ‘ट्विस्ट’ येणार आहे, जो पाहून प्रेक्षक थक्क होतील. एका बाजूला अढळ भक्ती आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक नियमांच्या पलीकडची इच्छा, असा हा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
या नवीन कथानकात हरिप्रिया नावाच्या एका निस्सीम स्वामीभक्ताची एन्ट्री होणार आहे. हरिप्रियाच्या मनात बालपणापासूनच विठुरायाबद्दल अतोनात प्रेम आणि भक्ती आहे. मात्र, तिची ही भक्ती केवळ नामस्मरणापुरती मर्यादित नाही; तर तिला प्रत्यक्ष पांडुरंगाशी लग्न करायचे आहे. कलियुगात एखाद्या मानवाने देवाशी विवाह करण्याची इच्छा धरणे, हे जगाच्या दृष्टीने ‘वेडेपण’ किंवा ‘अशक्य’ वाटू शकते. हरिप्रियाची ही अनोखी ओढ पाहून तिचे कुटुंबीय आणि समाजातील लोक संभ्रमात पडले आहेत.
जेव्हा कोणताच मार्ग दिसत नाही, तेव्हा भक्त स्वामींच्या चरणी धाव घेतात. हरिप्रियाची ही निखळ पण ‘अशक्य’ वाटणारी इच्छा पूर्ण करण्यासाठी आता स्वतः श्री स्वामी समर्थ उभे ठाकणार आहेत. “अशक्य ही शक्य करतील स्वामी” या उक्तीप्रमाणे, स्वामी आपल्या या लाडक्या भक्ताची ही भक्ती कशी पूर्ण करतात? विठुराया स्वतः तिला दर्शन देऊन ही इच्छा मान्य करणार का? की स्वामी आपल्या कृपेने काही वेगळा चमत्कार घडवणार? हे पाहणे प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे.
भक्तीची ही अनोखी गाथा आणि स्वामींची अगाध लीला अनुभवण्यासाठी पाहायला विसरू नका, ‘जय जय स्वामी समर्थ’ फक्त कलर्स मराठीवर.
