पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “जिथली माती भुसभुशीत असते तिथेच घुशी शिरतात, खडकात नाही.” महाराष्ट्रातील मराठी माणूस आणि राज्यकर्ते मवाळ पडत असल्यामुळेच बाहेरून येणारे लोक शिरजोर होत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, “परप्रांतीय रिक्षाचालकांना मराठी शिकवून काय साध्य होणार? उद्या ते मराठीतून बोलतील आणि मराठी भाषेचे पुरस्कारही घेतील. पण मूळ प्रश्न त्यांच्या राज्यांतील स्थितीचा आहे. त्यांच्या राज्यांतील परिस्थिती सुधारत नाही म्हणून ते इथे येतात आणि इथे येऊन आपल्यालाच धमक्या देतात.” महाराष्ट्रातील राज्यकर्ते नेमक्या कोणाच्या दबावाखाली ‘बॅकफूट’वर खेळत आहेत, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
निर्णयाची पार्श्वभूमी: राज्य सरकारने १ मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अनेक संघटनांनी याला विरोध करत वेळ मागून घेतल्याने, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही मुदत आता १५ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. १५ ऑगस्टनंतर ज्या चालकांना प्राथमिक मराठी येणार नाही, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे सरकारने स्पष्ट केले आहे.
