अटारी-वाघा बॉर्डर ‘बीटिंग रिट्रीट’ सोहळ्याच्या वेळेत बदल; १ मे पासून लागू होणार नवे वेळापत्रक

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर BSF चा मोठा निर्णय; आता ६ वाजता रंगणार देशभक्तीचा सोहळा.

Must read

भारत-पाकिस्तान सीमेवरील अटारी-वाघा बॉर्डरवर होणारा ‘बीटिंग रिट्रीट’ सोहळा हा केवळ एक लष्करी संचलन नसून तो प्रत्येक भारतीयाच्या अंगावर शहारे आणणारा अनुभव असतो. दररोज हजारो पर्यटक हा अभूतपूर्व सोहळा डोळ्यांत साठवण्यासाठी अमृतसरमध्ये गर्दी करतात. जर तुम्हीही या उन्हाळ्यात या देशप्रेमाने रसरसलेल्या सोहळ्याला भेट देण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

काय आहे नवीन बदल?

वाढता उन्हाळा आणि दिवसाच्या बदलत्या वेळेचा विचार करून, सीमा सुरक्षा दलाने (BSF) १ मे पासून या सोहळ्याच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा चित्तथरारक सोहळा पूर्वीपेक्षा अर्धा तास उशिरा सुरू होईल. नव्या वेळापत्रकानुसार, संध्याकाळी ६:०० वाजता सोहळ्याला सुरुवात होईल आणि ६:३० वाजता तो समाप्त होईल. यापूर्वी हा सोहळा ५:३० ते ६:०० या वेळेत पार पडत असे.

वेळ का बदलली?

पंजाबमधील कडाक्याचे ऊन आणि उशिरा होणारा सूर्यास्त यामुळे पर्यटकांना उष्णतेचा त्रास होऊ नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. संध्याकाळच्या सौम्य प्रकाशात पर्यटकांना जवानांचा तो दिमाखदार आवेश, उंच जाणारे पाय आणि दोन्ही देशांच्या ध्वजांचे संचलन अधिक चांगल्या प्रकारे अनुभवता येईल.

पर्यकांसाठी महत्त्वाची सूचना:

सोहळा जरी ६ वाजता सुरू होत असला, तरी कडेकोट सुरक्षा तपासणी आणि आसनव्यवस्था मिळवण्यासाठी पर्यटकांना दुपारी ३:३० ते ४:०० च्या सुमारास बॉर्डरवर पोहोचण्याचा सल्ला दिला जातो. ‘भारत माता की जय’ च्या घोषणा आणि जवानांचा तो जबरदस्त आत्मविश्वास पाहण्यासाठी आता तुम्हाला तुमच्या प्रवासाचे नियोजन या नवीन वेळेनुसार करावे लागेल.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article