बॉलिवूडचा ‘नवाब’ सैफ अली खान पुन्हा एकदा पडद्यावर एका दमदार पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत अवतरला आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार झालेला आणि नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला ‘कर्तव्य’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. मात्र, चर्चा जितकी सकारात्मक आहे, त्यापेक्षा जास्त या चित्रपटाच्या कमकुवत बाजूंकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले जात आहे.
काय आहे चित्रपटाची गोष्ट? या चित्रपटाची कथा ‘झमली’ नावाच्या एका छोट्या गावाभोवती फिरते. सैफ अली खान यात ‘पवन मलिक’ या प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. एका पत्रकाराची हत्या होते आणि या प्रकरणाचा तपास करत असताना पवन एका मोठ्या आध्यात्मिक गुरूच्या (आनंद श्री) जाळ्यात अडकतो. एका बाजूला समाजातील भ्रष्टाचार आणि दुसरीकडे स्वतःच्या घरातील जातिभेदाचे राजकारण, अशा कात्रीत पवन सापडला आहे. त्याचे स्वतःचे भाऊ एका वेगळ्या जातीच्या मुलीसोबत पळून जातात, ज्यामुळे त्याच्या कौटुंबिक प्रतिष्ठेला धक्का बसतो. कर्तव्य आणि कुटुंब यांच्यातील हा संघर्ष म्हणजे हा चित्रपट.
कुठे चुकलं गणित? सैफ अली खानने याआधी ‘सेक्रेड गेम्स’मध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका अप्रतिम साकारली होती, त्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. मात्र, ‘कर्तव्य’चे कथानक अत्यंत संथ आणि प्रेडिक्टेबल (पुढं काय होणार हे ओळखता येण्यासारखं) आहे. चित्रपटात कोणतेही मोठे ट्विस्ट किंवा थरार अनुभवायला मिळत नाही. सैफने त्याचे काम चोख बजावले असले, तरी पटकथेतील कमतरतेमुळे तो प्रेक्षकांना खिळवून ठेवू शकत नाही.
संजय मिश्रा आणि रसिका दुग्गल यांसारखे दिग्गज कलाकार सोबत असूनही त्यांना फारशी वाव देणारी भूमिका मिळालेली नाही. चित्रपटाचा शेवट अत्यंत घाईघाईने उरकल्यासारखा वाटतो, ज्यामुळे प्रेक्षक समाधानी होत नाहीत.
थोडक्यात सांगायचे तर… जर तुम्ही सैफ अली खानचे चाहते असाल आणि तुम्हाला वास्तववादी, साध्या धाटणीचे गुन्हेगारी नाट्य आवडत असेल, तर तुम्ही हा चित्रपट एकदा पाहू शकता. पण जर तुम्ही ‘सिंघम’ किंवा ‘दबंग’ सारख्या मसाला चित्रपटाची अपेक्षा करत असाल, तर हा चित्रपट तुमची निराशा करू शकतो.
