रत्नागिरी: रत्नागिरी शहराजवळील राजीवडा खाडीत सध्या गाळाचे प्रचंड साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे इथल्या स्थानिक मच्छीमारांना समुद्रात ये-जा करताना दररोज आपला जीव मुठीत घ्यावा लागतोय. या वाढत्या गाळामुळेच बुधवारी सकाळी एका मच्छीमारी नौकेचा थरार पाहायला मिळाला. पाण्याचा आणि खाडीच्या मुखाशी साचलेल्या गाळाचा अंदाज न आल्याने, राजिवड्यातील एक मोठी मच्छीमारी नौका थेट चिखलात आणि गाळात रुतून बसली.
नेमकं काय घडलं?
बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे समुद्रातून मासेमारी करून ही नौका परतत होती. खाडीच्या मुखाशी ओहोटीमुळे पाण्याची पातळी कमी झाली होती आणि खाली गाळाचा मोठा ढिगारा साचला होता. नौकेच्या तांडेलला (कॅप्टन) पाण्याचा आणि खालील गाळाचा अचूक अंदाज आला नाही. परिणामी, चालती नौका थेट गाळात जाऊन रुतली आणि जागेवरच अडकली.
नौका अडकल्याचे समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. ओहोटी असल्यामुळे ही नौका लगेच बाहेर काढणे अशक्य होते. अखेर मच्छीमारांना समुद्राला भरती येण्याची वाट पाहावी लागली. सकाळी अडकलेली नौका दुपारी समुद्राला मोठी भरती आल्यानंतर आणि लाटांच्या जोराने तब्बल ४ तासांनंतर गाळातून बाहेर पडली. या ४ तासांच्या काळात नौकेवरील खलाशी आणि मच्छीमारांचा जीव पार टांगणीला लागला होता. सुदैवाने, भरतीच्या लाटांमुळे नौका सुरक्षित बाहेर आली आणि मोठा अनर्थ टळला.
१४३.९७ कोटींचा प्रकल्प फक्त कागदावरच?
राजीवडा खाडीतील गाळाची ही समस्या अनेक वर्षांची आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि जेट्टीच्या सुरक्षेसाठी शासनाने १४३ कोटी ९६ लाख ८१ हजार ३५५ रुपये (सुमारे १४४ कोटी) इतका प्रचंड निधी मंजूर केला आहे.
महाराष्ट्र सागरी मंडळाने (MMB) तयार केलेल्या या योजनेअंतर्गत खाडीच्या मुखाजवळ लाटा रोखण्यासाठी ‘ब्रेक वॉटर वॉल ग्रोयान्स टाईप’ (Breakwater Wall) बंधारा बांधणे आणि संपूर्ण खाडीतील गाळ उपसणे, अशी कामे होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) या प्रकल्पाच्या अंदाजपत्रकाला मंजुरीही दिली आहे.
निधी असूनही कामाला ‘मुहूर्त’ का नाही?
एवढा मोठा निधी मंजूर होऊन आणि मासेमारीचा यंदाचा संपूर्ण हंगाम संपून गेला, तरीही प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. प्रशासकीय दिरंगाईमुळे हे काम रखडले असून, आता त्यात दोन मोठी विघ्नं आली आहेत: १. आचारसंहिता: सध्या विधान परिषदेची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे या कामाचा अधिकृत शुभारंभ करणे किंवा निधी वितरित करणे कायदेशीररीत्या कठीण बनले आहे. २. पावसाळा: जून महिन्यापासून पावसाळा सुरू होत असल्याने समुद्रातील आणि खाडीतील कामे पूर्णपणे बंद राहतात.
त्यामुळे आता थेट पावसाळ्यानंतर, म्हणजेच पुढील मच्छीमारी हंगामातच गाळ उपशाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानिक मच्छीमारांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मच्छीमारांची आग्रही मागणी: “आचारसंहिता किंवा पावसाळ्याचे कारण पुढे करून आम्हाला धोक्यात टाकू नका. मंजूर झालेल्या कामातून या खाडीमुखातील गाळ तातडीने काढून मच्छीमारांना सुरक्षित ये-जा करण्यासाठी किमान एक तात्पुरता ‘नेव्हिगेशन चॅनेल’ (Navigation Channel) तरी तयार करून द्या!”
