महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत दिलासादायक ठरला आहे. तब्बल १८ वर्षांपूर्वी म्हणजेच २००८ मध्ये रेल्वे भरती दरम्यान झालेल्या कथित हिंसाचार आणि आंदोलनाप्रकरणी ठाणे न्यायालयाने आज मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपांतून राज ठाकरे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता (Acquitted) केली आहे. या निर्णयामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये आणि राजकीय वर्तुळात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
नेमकं काय होतं प्रकरण?
हे संपूर्ण प्रकरण ऑक्टोबर २००८ मधील आहे. त्यावेळी रेल्वे प्रशासनातर्फे अcategory-IV (गट-ड) पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात होती. या भरती परीक्षेसाठी कल्याण आणि मुंबई परिसरातील केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय (विशेषतः बिहार आणि उत्तर प्रदेशातील) उमेदवार आले होते. “स्थानिक मराठी तरुणांचे हक्क डावलून परप्रांतीयांना रेल्वे नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिले जात आहे,” असा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकावर आणि परीक्षा केंद्रांवर तीव्र आंदोलन छेडले होते. या आंदोलनादरम्यान तोडफोड, मारहाण आणि रेल्वे मालमत्तेचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणात राज ठाकरे यांना त्यावेळी अटकही झाली होती, मात्र नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली.
न्यायालयात काय घडले?
सुरुवातीला या प्रकरणाची सुनावणी कल्याण न्यायालयात सुरू होती, परंतु नंतर हे प्रकरण ठाणे रेल्वे न्यायालयात (विशेष सत्र न्यायालय) वर्ग करण्यात आले. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आरोपींचे जबाब नोंदवण्यात आले होते. या सुनावणीत राज ठाकरे यांनी स्वतः कोर्टासमोर हजर राहून आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते. “हे संपूर्ण प्रकरण बनावट असून आंदोलनाच्या वेळी मी घटनास्थळी (कल्याण) हजर नव्हतो, तर नाशिकमध्ये होतो,” अशी भूमिका त्यांनी मांडली होती. तसेच विरोधी पक्षातील साक्षीदार आणि फिर्यादींचे दावे पूर्णपणे खोटे असल्याचे त्यांच्या वकिलांनी कोर्टात सिद्ध केले. दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर अखेर न्यायालयाने पुराव्या अभावी राज ठाकरे यांची या गुन्ह्यातून सन्मानपूर्वक सुटका केली.
हा निर्णय मनसेच्या ‘मराठी पाऊल’ आणि ‘स्थानिक रोजगाराच्या’ मुद्द्याला न्यायालयीन स्तरावर मिळालेली एक प्रकारे क्लीन चिट मानली जात आहे.
