सातारा जिल्ह्यातील माण तालुका म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो दुष्काळी पट्टा. पण या दुष्काळाच्या झळा किती भयावह असू शकतात, याचं एक विदारक दृश्य नुकतंच समोर आलं आहे. देशाच्या स्वातंत्र्याला साडेसात दशकं पूर्ण झाली असली, तरी आजही माण तालुक्यातील पांगरी गावातील ग्रामस्थांच्या नशिबी पाण्यासाठीचा संघर्ष संपलेला नाही.
या संघर्षाचं सर्वात हृदयद्रावक रूप पाहायला मिळतं ते एका ८० वर्षांच्या वृद्धाच्या रूपात. वय वाढलंय, शरीराने साथ सोडली आहे, पण तहान भागवण्यासाठी आणि जगण्यासाठी या वृद्धाला आजही हातामध्ये काठी आणि डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. ज्या वयात या आजोबांनी विश्रांती घ्यायला हवी, त्या वयात त्यांना घोटभर पाण्यासाठी निसर्गाशी आणि व्यवस्थेशी लढा द्यावा लागत आहे.
शासनाच्या वतीने अनेक जलसंधारणाच्या योजना राबवल्या गेल्याचे दावे केले जातात, मात्र पांगरी सारख्या दुर्गम भागातील ही परिस्थिती पाहिल्यावर हे सर्व दावे कागदावरच असल्याचे दिसून येते. लोकप्रतिनिधी येतात, आश्वासनं देतात आणि जातात; मात्र येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. ही केवळ एका वृद्धाची कहाणी नसून, संपूर्ण गावाचा आणि प्रशासकीय अनास्थेचा आरसा आहे.
