शालेय विद्यार्थ्यांसाठी वर्षाअखेर म्हणजे सहलीच हंगाम. या हंगामात जिल्ह्यातील एसटी बसला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राज्यात झालेल्या सर्वाधिक सहलीच्या आरक्षणामध्ये रत्नागिरी जिल्हा तिसरा आहे. तब्बल २०१ एसटी बसेसचे या वेळी बुकिंग झाले. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी यंदा शालेय सहलींना नवीन गाड्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला तसेच एसटीच्या गाड्यां व्यतिरिक्त खासगी ट्रॅव्हल्स किंवा बसेस वापरल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला. परिवहन मंत्रालयाच्या आदेशाचा एसटी महामंडळाला चांगलाच फायदा झाला. त्याचा सकारात्मक परिणाम शालेय सहलीवर झाला. नोव्हेंबर महिन्यात राज्यात तब्बल २२४३ गाड्या राज्याच्या विविध आगारातून शालेय सहलींसाठी देण्यात आल्या. यातून महामंडळाला १० कोटी ८५ लाखांचा महसूल प्राप्त झाला.
एसटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शालेय सहलीला ५० टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे अतिशय माफक दरामध्ये विद्यार्थ्यांना शालेय सहलीचा अनुभव घेता येतो. एसटीच्या ३१ विभागापैकी कोल्हापूर विभागाने ३७५ एसटी बस शालेय सहलीसाठी उपलब्ध करून देऊन सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवत १ कोटी ७७ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. त्या खालोखाल सांगली विभागाने २११ आणि रत्नागिरी विभागाने २०१ गाड्यांचे आरक्षण करत चांगली कामगिरी केली आहे. डिसेंबर व जानेवारी महिन्यातदेखील विविध शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी नव्या गाड्या उपलब्ध करून देण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे. त्यामुळे यंदा एसटीला सहलीच्या हंगामाने चांगलेच तारले आहे.
