महावितरण येणाऱ्या कंपनीकडून लावण्यात स्मार्ट मीटरविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने लांजा येथे आक्रमक भूमिका घेतली आहे. लोकांची कोणतीही तक्रार नसताना तसेच अनेक ठिकाणी घरात कुणीही नसतानाही जुने वीजमीटर बदलले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर शिवसैनिकांनी महावितरण अधिकाऱ्यांना जाब विचारत ही जबरदस्ती सहन केली जाणार नाही, असा इशारा दिला. महावितरणतर्फे स्मार्ट मीटर बसवण्याच्या पार्श्वभूमीवर लांजा तालुका शिवसेनेच्यावतीने आज महावितरण कार्यालयात जाऊन उपअभियंता चव्हाण यांना धारेवर धरले. ग्राहकांच्या परवानगीशिवाय आणि कोणतीही पूर्वसूचना न देता मीटर बदलले जात असल्याबाबत नागरिकांकडून शिवसैनिकांकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर शहरप्रमुख मोहन तोडकरी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी थेट महावितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांशी जाब विचारला. या वेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीही वारंवार पत्रव्यवहार करून स्मार्ट मीटर बसवण्याबाबत महावितरणकडे विचारणा केली होती; मात्र त्यास समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचा आरोप केला.
शासनाची स्मार्ट मीटरविषयी सतत बदलणारी भूमिका लक्षात घेता नागरिकांवर होणारी ही ‘गळचेपी’ खपवून घेतली जाणार नाही, असे युवा तालुकाधिकारी अभिजित राजेशिर्के यांनी ठणकावून सांगितले. स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी नागरिकांमध्ये संभ्रम आणि भितीचे वातावरण असून, त्यामुळे लवकरात लवकर जनसुनावणी घेऊन नागरिकांच्या शंका दूर कराव्यात, अशी मागणी शिवसेनेने केली. जनसुनावणी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल तसेच प्रसंगी स्मार्ट मीटरची ‘होळी’ करण्याचा इशाराही शिवसैनिकांनी दिला. याबाबत झालेल्या चर्चेनंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लवकरच स्मार्ट मीटरसंदर्भात जनसुनावणी घेण्याचे आश्वासन दिले. तोपर्यंत कोणतीही तक्रार नसताना अथवा ग्राहकांची संमती न घेता कुणाचेही मीटर बदलू नयेत, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेने मांडली. या वेळी मोहन तोडकरी, अभिजित राजेशिर्के, पिंट्या लिंगायत, बाबू गुरव, सुजित भुर्के, बाबा धावणे उपस्थित होते.
