सर्व्हर डाउनमुळे रास्त धान्य वितरण व्यवस्था कोलमडली आहे. ही समस्या केवळ रत्नागिरी जिल्ह्यातच नाही, तर राज्यभरात निर्माण झाली आहे. त्यामुळे धान्य वाटपास ब्रेक लागला आहे. नेटवर्क आल्यानंतर धान्य दिले जात आहे. पंधरा दिवसांपासून पॉस मशीन चालू, बंद होत आहे. त्यामुळे दुकानदार, रेशनकार्डधारक हैराण झालेत धान्य वाटप करण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने राज्यासह जिल्ह्यात नवीन पॉस मशीन देण्यात आले. त्यामुळे धान्य वितरण सुरळीत सुरू होते; मात्र आता पॉस मशीनला कधी नेटवर्क, कधी सर्व्हर डाउन, साईट बंदची समस्या भेडसावत आहे. नेटवर्क नसेल तर धान्य वाटपाला विलंब होत आहे. गेल्या वर्षापासून नवीन फोरजी पॉस मशीन वाटप केल्या आहेत. त्यामुळे धान्य वाटप सुरळीत होऊन धान्य वाटपासंदर्भात तक्रारी कमी झाल्या होत्या; परंतु मागील काही महिन्यांपासून तसेच गेल्या पंधरा दिवसांपासून पॉस मशीनला सव्र्व्हर, नेटवर्क, साईटची समस्या येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात धान्य वाटपास अडचण होत आहे.
काही दुकानदार तक्रारी येऊ नयेत म्हणून लाभार्थ्यांना रेशनकार्ड ठेवून धान्य देतात. त्यानंतर ओटीपीसाठी संपर्क करून त्यांची माहिती भरली जात आहे. काही ठिकाणी नेटवर्क, साईट समस्या असल्याचे सांगून नंतर येण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळे लाभार्थी वैतागले आहेत. नव्या वर्षांत पॉस मशीनची समस्या येत असल्यामुळे रेशन दुकानदार हताश झाले आहेत. जिल्हा पुरवठा विभागाकडून या संदर्भात राज्य पुरवठा विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत.
समस्या दूर होणे गरजेचे – सर्व्हर, नेटवर्कची समस्या काही ठिकाणी येत आहे. ती समस्या कमी करण्यासाठी पुरवठा विभागाकडे यंत्रणा कमी आहे. नेटवर्कची समस्या काही प्रमाणात तालुक्यात आहे. जर ऑफलाईन धान्य दिले तर दुकानदारांना कमिशनची समस्या येते. सव्र्व्हरची समस्या असेल तर राज्य पुरवठा विभागाकडून ती समस्या दूर होणे गरजेचे आहे, असे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी सांगितले.

