राजेशाही थाट, कौटुंबिक राजकारण आणि ग्लॅमरस अंदाजामुळे या सीरिजने प्रेक्षकांची मने जिंकली असून ती एक ‘ओटीटी हिट’ ठरली आहे. मात्र, या यशाच्या आनंदात असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या सीरिजची मुख्य अभिनेत्री भूमी पेडणेकर आता ‘द रॉयल्स’च्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
ट्रोलिंगचा बसला फटका?
‘द रॉयल्स’ प्रदर्शित झाल्यानंतर भूमी पेडणेकरला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. तिच्या लूकपासून ते अभिनयापर्यंत अनेकांनी नकारात्मक कमेंट्स केल्या होत्या. या ट्रोलिंगमुळे भूमी मानसिकरीत्या थकली होती आणि तिने अभिनयातून काही काळ ब्रेकही घेतला होता. अनेक चाहत्यांना वाटत आहे की, याच सततच्या ट्रोलिंगमुळे भूमीने या सीरिजमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असावा.
कथानकात होणार मोठे बदल!
मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार भूमीच्या एक्झिटचे कारण केवळ ट्रोलिंग नसून सीरिजच्या कथानकातील बदल हे देखील आहे. पहिल्या सीझनमध्ये भूमी आणि ईशान खट्टर यांच्यातील अधुरी प्रेमकथा दाखवण्यात आली होती. आता दुसऱ्या सीझनमध्ये निर्मात्यांना ही प्रेमकथा पुढे नेण्याऐवजी राजघराण्यातील अंतर्गत राजकारण आणि कौटुंबिक संघर्षावर अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यामुळेच ‘ऑर्गेनिक’ पद्धतीने कथानक पुढे नेण्यासाठी भूमीच्या पात्राला डच्चू देण्यात आल्याचे समजते
भूमीचे आगामी प्रोजेक्ट्स
‘द रॉयल्स’ सोडली असली तरी भूमीकडे कामाची कमतरता नाही. ती लवकरच ‘दलदल २’ (Daldal 2) मध्ये एका कडक पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच, अभिनेता इम्रान खानच्या कमबॅक फिल्ममध्येही ती महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.
जरी भूमी या सीरिजमध्ये नसली, तरी ‘द रॉयल्स सीजन २’ मध्ये ईशान खट्टर, साक्षी तन्वर आणि झीनत अमान यांचा रॉयल अंदाज पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
