मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बावनदी येथील पुलाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे; मात्र हे काम करत असताना कंत्राटदाराकडून सुरक्षेच्या नियमांना पूर्णपणे हरताळ फासला गेल्याचे चित्र दिसत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंनी भराव टाकण्याचे काम सुरू असले, तरी परिसरात कोणतीही सुरक्षायंत्रणा नसल्याने या ठिकाणी मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महामार्गावर ज्या ठिकाणी काम सुरू असते तिथे नियमानुसार सूचनाफलक आणि दिशादर्शक असणे अनिवार्य आहे; मात्र बावनदी पुलाच्या परिसरात ना कुठे सूचनाफलक आहेत ना दिशादर्शक. रस्ता अरुंद झाला असून, अचानक वळणे आल्याने समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही. विशेषतः नवीन वाहनचालकांना या स्थितीमुळे गोंधळाला सामोरे जावे लागत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे या परिसरात रात्रीच्यावेळी कोणतीही प्रकाशव्यवस्था करण्यात आलेली नाही. गडद अंधारात अर्धवट राहिलेला भराव आणि रस्त्यावरील अडथळे दिसत नसल्याने वाहनचालकांच्या काळजाचा ठोका चुकत आहे.
रात्रीच्यावेळी या ठिकाणी वाहन कोसळून गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दररोज या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. कामाच्या ठिकाणी तातडीने सूचनाफलक आणि रिफ्लेक्टर्स लावण्यात यावेत, रात्रीच्या प्रवासासाठी पुरेशी प्रकाशव्यवस्था करावी, भरावाचे काम करताना रस्ता सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी, पुलाचे काम गतीने पूर्ण करून वाहतूक कोंडीतून मुक्तता करावी, संबंधित ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात; अन्यथा होणाऱ्या दुर्घटनेला प्रशासनच जबाबदार असेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
गणपतीपुळेकडे मार्गावर फलक लावा – महामार्गावर फलकांचा अभाव असल्यामुळे अनेक पर्यटकांना फटका बसलेला आहे. धामणीजवळ गणपतीपु-ळेकडे जाण्यासाठी महामा-र्गावर पर्यायी मार्ग आहे. मात्र, त्या मार्गावर जाण्यासाठीचा फलकच लावण्यात आलेला नाही. तेथील महामार्गाचे काम पूर्ण होत आलेले आहे. या त्रुटीमुळे अनेक पर्यटकांना माघारी परतावे लागले होते. याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परजिल्ह्यातून आलेल्या पर्यटकांकडून केली जात आहे.

