मुंबई/चेन्नई: आयपीएलच्या मैदानात सध्या सामन्यांइतकीच चर्चा मैदानाबाहेरील घडामोडींची रंगू लागली आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि चेन्नई सुपर किंग्सचे (CSK) सीईओ काशी विश्वनाथन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, यामुळे क्रिकेट वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आहे – हार्दिक पांड्या २०२७ च्या आयपीएलआधी चेन्नईमध्ये जाणार का?
नेमकं प्रकरण काय? चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यानंतर हार्दिक पांड्या आणि सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांच्यात बराच वेळ गंभीर चर्चा सुरू होती. मुंबई इंडियन्ससाठी चालू हंगाम अत्यंत खराब ठरला असून, सलग पराभवांमुळे हार्दिक पांड्या सध्या प्रचंड दडपणाखाली आहे. अशा परिस्थितीत प्रतिस्पर्धी संघाच्या मुख्य अधिकार्याशी हार्दिकने केलेली ही चर्चा केवळ सदिच्छा भेट आहे की मोठ्या ‘ट्रेड’ची नांदी, यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.
बदलीचे (Trade) ३ संभाव्य मार्ग: सोशल मीडियावर या संभाव्य बदलीसंदर्भात तीन मोठे दावे केले जात आहेत: १. हार्दिक पांड्या विरुद्ध शिवम दुबे: भारताचे हे दोन दिग्गज अष्टपैलू खेळाडू एकमेकांच्या जागी जाऊ शकतात अशी चर्चा आहे. मात्र, दोघांच्या मानधनातील फरक पाहता यात तिसऱ्या खेळाडूचा समावेश होऊ शकतो. २. ऋतुराज गायकवाड आणि हार्दिक पांड्या: चेन्नईचा सध्याचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला मुंबई आपल्याकडे घेऊ शकते का? हा सर्वात धक्कादायक दावा केला जात आहे. ३. ऑल-कॅश ट्रेड: जसे हार्दिक गुजरात टायटन्समधून मुंबईत आला, तसेच चेन्नई मोठी रक्कम मोजून हार्दिकला आपल्या संघात सामील करून घेऊ शकते.
काय म्हणतात तज्ज्ञ? न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू सायमन डुल यांनी यापूर्वीच मत व्यक्त केले होते की, जर हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईची कामगिरी सुधारत नसेल, तर त्याला संघातून मुक्त करणेच योग्य ठरेल. दरम्यान, ही अधिकृत माहिती नसून केवळ व्हायरल व्हिडिओ आणि चाहत्यांच्या अंदाजांवर आधारित चर्चा आहे. हार्दिक पांड्या खरंच धोनीच्या जुन्या संघात दिसणार का, हे येणारा काळच ठरवेल.
