आयपीएलच्या धबडग्यात खेळाडूंच्या मैदानावरील कामगिरीसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही मोठी चर्चा असते. मात्र, आता हेच वैयक्तिक आयुष्य आणि शिस्तीचा मुद्दा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) रडारवर आला आहे. आयपीएलच्या १९ व्या हंगामात खेळाडू आणि टीम व्यवस्थापनाकडून वारंवार नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पाहून बीसीसीआयने आता कडक पावले उचलण्याचे ठरवले आहे.
नुकतेच हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंह आणि ईशान किशन यांसारखे स्टार खेळाडू त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत सार्वजनिक ठिकाणी आणि विमानतळावर कॅमेऱ्यात कैद झाले. या फोटोंनी सोशल मीडियावर चर्चा तर घडवून आणलीच, पण बीसीसीआयचा पाराही चढवला आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केले आहे की, खेळाडूंसोबत अनधिकृत व्यक्तींचा वाढता वावर हा ‘अँटी-करप्शन प्रोटोकॉल’च्या विरोधात आहे.
नेमकं प्रकरण काय? बीसीसीआयच्या निदर्शनास आले आहे की, काही खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स आणि अनधिकृत व्यक्ती केवळ त्यांच्यासोबत फिरतच नाहीत, तर चक्क टीम बसमधून प्रवास करत आहेत. इतकेच नाही तर टीम हॉटेलमध्ये आणि खेळाडूंच्या खोल्यांमध्येही या व्यक्तींचा मुक्त वावर असतो, ज्यासाठी बोर्डाची कोणतीही परवानगी घेतलेली नसते.
शिस्तीचा बडगा: केवळ गर्लफ्रेंड्सच नाही, तर टीम अधिकारी आणि खेळाडूंच्या इतर वर्तणुकीवरही बोर्डाने नाराजी व्यक्त केली आहे. १. मोबाईलचा वापर: राजस्थान रॉयल्सच्या टीम मॅनेजरने डगआऊटमध्ये मोबाईल वापरल्याने त्यांना १ लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. २. ड्रेसिंग रूममध्ये वेपिंग: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग ड्रेसिंग रूममध्ये वेपिंग (ई-सिगारेट) करताना आढळल्याने बोर्डाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.
बीसीसीआय लवकरच एक नवी ‘अॅडव्हायजरी’ जारी करणार आहे. यामध्ये खेळाडूंच्या प्रवासादरम्यान त्यांच्यासोबत कोण असू शकते आणि कोण नाही, याचे कडक नियम असतील. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खेळाडूंवर किंवा फ्रँचायझी अधिकाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा बोर्डाने दिला आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या ग्लॅमरला शिस्तीची जोड द्यावी लागणार, हे मात्र नक्की!
