हवामान तज्ज्ञांच्या मते, हा ‘एल निनो’ मानवी इतिहासातील सर्वात तीव्र हवामान बदलांपैकी एक ठरू शकतो. साधारण १५० वर्षांपूर्वी अशाच प्रकारच्या एल निनोमुळे जगभरात प्रचंड उष्णतेच्या लाटा आल्या होत्या आणि भीषण दुष्काळ पडला होता. त्या काळात पिकांचे मोठे नुकसान झाले होते आणि अन्नधान्याच्या टंचाईमुळे जगभरातील सुमारे ४% लोकसंख्येला आपला जीव गमवावा लागला होता. आता पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भारतावर काय परिणाम होणार? भारतासाठी हा इशारा अत्यंत कळीचा आहे. भारताची अर्थव्यवस्था आणि शेती प्रामुख्याने मान्सूनवर अवलंबून आहे. ‘एल निनो’ सक्रिय झाला की मान्सून कमकुवत होतो, हा आजवरचा अनुभव आहे. जर ‘सुपर एल निनो’ आला, तर उत्तर, मध्य आणि पूर्व भारतात पावसाचे प्रमाण कमालीचे घटू शकते.
यामुळे केवळ शेतीवरच परिणाम होणार नाही, तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल आणि अन्नाचे भाव वाढून महागाई गगनाला भिदेल. शहरांमध्ये वाढत्या आर्द्रतेमुळे आणि उष्णतेमुळे आरोग्याच्या समस्याही वाढण्याची शक्यता आहे. थोडक्यात, हे निसर्गाचे चक्र येणाऱ्या काळात मानवासाठी मोठी कसोटी घेणारे ठरणार आहे.
